
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | पेण | प्रतिनिधी :
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतभूमी लोणंद ते पंढरपूर मार्गावर इंचगिरी संप्रदायाचे सिद्धपुरुष शंकर महाराज रसाळ यांच्या दिंडीत एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या या दिंडीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीचे नेतृत्व मठाधिपती ह.भ.प. पांडुरंग महाराज रसाळ करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मार्गदर्शन अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. दिंडीत विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित गुरुबंधू आणि नामधारकांचा सक्रिय सहभाग आहे.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित तसेच गेली १५ वर्षे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे ह.भ.प. कृष्णा वर्तक यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सूक्ष्म अध्यापन पद्धती, परीक्षेची तयारी, ध्येय निश्चिती तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
फलटण एज्युकेशन संस्थेच्या सालपे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख टेंबरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांमध्ये आत्मचिंतन व अभ्यासाची योग्य दिशा निर्माण करणारे हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला देशाचे सेवानिवृत्त सैनिक व समाजसेवक दादा साळुंखे (जेऊर, ता. पुरंदर) यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. कृष्णा वर्तक यांनी उपस्थित शिक्षकवृंद व आयोजकांचे आभार मानले.
