
प्रतिनिधी
राज्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. मात्र ८ जुलैनंतर अनेक भागांत पावसाने अचानक ओढ दिली. धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, २० जुलैपर्यंत मान्सूनचा वेग काहीसा मंद राहण्याची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण असले तरी अपेक्षित पाऊस होणार नाही. मात्र विदर्भातील काही भागांत पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला
- पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये.
- स्थानिक हवामान अंदाजाचा नियमित आढावा घ्यावा.
- पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
- आवश्यक असल्यास कमी कालावधीची व कमी पाण्यावर येणारी पिके निवडावीत.
राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम
अवकाळी पाऊस, अनियमित मान्सून आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि विविध कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढत असल्याने राज्याच्या अर्थसंकल्पावरही मोठा ताण निर्माण होत आहे. कृषी क्षेत्राला मदत करताना विकासकामांसाठी निधी उपलब्ध ठेवणे हे शासनासमोरील मोठे आव्हान ठरत आहे.
दरम्यान, शेतकरी आणि नागरिकांनी अधिकृत हवामान अंदाजावर विश्वास ठेवून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी व हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

