रिसोड | प्रतिनिधी
रिसोड शहरात महावितरणकडून ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, महावितरणने पारदर्शक पद्धतीने ही मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक ग्राहकाचा मीटर बदलण्यापूर्वी लेखी अथवा एसएमएसद्वारे पूर्वसूचना देण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याबाबत महावितरणने लेखी हमी द्यावी.
मीटर बदलताना जुन्या आणि नव्या मीटरची रीडिंग लेखी स्वरूपात ग्राहकाला देण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिल येणार नाही, याबाबतही स्पष्ट माहिती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्मार्ट मीटरसंदर्भातील सर्व शंका दूर होईपर्यंत आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाईपर्यंत ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी रिसोड शहरातील नागरिकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.








