उरण | प्रतिनिधी
उलवे नोडमधील सेक्टर 24, 25 आणि 25-अ परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, खड्डे तातडीने न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. 16) मनसेचे पदाधिकारी व स्थानिक महिलांनी सिडकोचे अधिकारी योगेश गोसावी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे संबंधित परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सेक्टर 24, 25 आणि 25-अ मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते आहेत, हेच समजत नाही,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
यावेळी सिडको अधिकारी योगेश गोसावी यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
या वेळी उलवेचे माजी शहराध्यक्ष राहुल बाबुराव पाटील, मनिषा राहुल पाटील, सुनीता नामदेव पाटील, रेश्मा संदेश म्हात्रे, गव्हाण विभागाचे उपाध्यक्ष बबलू पाटील, पनवेल तालुका सचिव निर्दोष केशव गोंधळी, उलवे शहराध्यक्ष आकाश देशमुख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना होण्यापूर्वी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.









