पातूर | प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील उंबरवाडी येथे अवैध दारूविक्रीविरोधात चान्नी पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईपूर्वी चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दराडे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, महिला भगिनी आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील दारूविक्रेत्यांना अवैध दारूची विक्री तात्काळ बंद करण्याचा इशारा देण्यात आला.
बैठकीनंतर पोलिसांनी गावात शोधमोहीम राबवत अवैध हातभट्टी दारू तयार करण्याची आणि साठवून ठेवण्याची ठिकाणे शोधून काढली. या ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीर दारूसाठा नष्ट करण्यात आला. तसेच काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही दारू पाजली जात असल्याची बाब समोर आल्याने संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी तरुण आणि युवकांना मार्गदर्शन करत, “व्यसनमुक्त जीवन स्वीकारा आणि शिक्षण व रोजगाराच्या दिशेने वाटचाल करा. तरुणांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गावागावांत जनजागृती आणि पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संकल्प आहे,” असे सांगितले.
दरम्यान, व्यसनाधीन नागरिकांना समुपदेशन आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आलेगाव येथे लवकरच व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही निलेश कापकर यांनी दिली.
या कारवाईनंतर उंबरवाडीतील महिला आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत अवैध दारूविक्रीविरोधातील मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


