कवठे महांकाळ
कवठे महांकाळ तालुक्यातील तिसंगी गावाकडून येणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या मुख्य पाईपलाईनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासनाने कामाला गती दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तिसंगी येथून पुढे मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम वेगाने सुरू असून, या योजनेमुळे वाघोली, गर्जेवाडी आणि शेळकेवाडी या गावांतील मोठ्या प्रमाणावरील शेती ओलिताखाली येणार आहे. अनेक वर्षांपासून पाण्याअभावी कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
टेंभूचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर ऊस, भाजीपाला, फळबागा तसेच विविध नगदी पिकांची लागवड करणे शक्य होणार असून, त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सिंचनाबरोबरच जनावरांसाठीही पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाईपलाईनचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करून लवकरात लवकर पाणी वितरण सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित गावांमध्ये चाचणी स्वरूपात पाणी सोडण्यात येईल.
टेंभू उपसा सिंचन योजनेमुळे कवठे महांकाळ तालुक्यातील शेतीचा कायापालट होण्यास मदत होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



