किनवट | प्रतिनिधी
किनवट पोलिसांच्या तत्परतेमुळे, रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे रिक्षामध्ये विसरलेली सुमारे ८० हजार रुपये असलेली बॅग अवघ्या चार तासांत संबंधित महिलेच्या ताब्यात देण्यात आली. या घटनेमुळे किनवट पोलिसांसह प्रामाणिक रिक्षाचालकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दिग्रस येथील सौ. दिपाली अवधूत कदम या त्यांच्या आजीच्या निधनामुळे सकाळी साडेआठच्या सुमारास मुलांसह गावाकडे निघाल्या होत्या. दुपारी अंत्यविधीसाठी वेळेत पोहोचण्याच्या घाईत त्या गोकुंदा येथून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसल्या. मात्र, प्रवासादरम्यान सुमारे ८० हजार रुपये असलेली बॅग त्या रिक्षातच विसरून गेल्या.
ही बाब लक्षात येताच त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर शिवसेना तालुकाध्यक्ष बालाजी मुरकुटे, युवासेना तालुकाध्यक्ष अतुल दर्शनवाड तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन कदम यांनी रिक्षाचा शोध सुरू केला. त्याचवेळी किनवट पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मदत मागण्यात आली.
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवत संबंधित रिक्षाचा शोध सुरू केला. काही वेळातच चिखली (बु.) येथील रिक्षाचालक शेख सलीम यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आपल्या रिक्षात बॅग असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणतीही छेडछाड न करता ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली.
आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासांत ही बॅग महिलेचे पती अवधूत अशोक कदम यांच्या ताब्यात सुपूर्द केली. त्यामुळे कदम कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
यावेळी बालाजी मुरकुटे, अतुल दर्शनवाड, सचिन कदम, रमेश कदम, अरविंद सूर्यवंशी, उत्तम डोंगरे, प्रमोद जाधव, अवधूत कदम, अझर शेख, शेख निजाम, शेख इब्राहिम आदी उपस्थित होते. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम वाडगूरे, पोलीस कॉन्स्टेबल बाळू कुडमेथे आणि प्रामाणिक रिक्षाचालक शेख सलीम यांचा सत्कार करण्यात आला.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे किनवट पोलिसांची कार्यतत्परता आणि रिक्षाचालक शेख सलीम यांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


