📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | करमाळा | प्रतिनिधी
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या व्यक्तींनी आपल्या पदाची जबाबदारी ओळखून प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते व मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले.
करमाळा तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या २४ सदस्यांना निवडपत्र प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी करमाळा तालुक्यातील २४ जणांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदीदी बागल व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या सदस्यांना करमाळा येथील कार्यालयात दिग्विजय बागल व विलासराव घुमरे यांच्या हस्ते निवडपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या माध्यमातून सामान्य नागरिक, विद्यार्थी व गरजू व्यक्तींना मदत करण्याची मोठी संधी मिळाल्याचे सांगितले. कोणत्याही वेळेचे बंधन न ठेवता लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास आदिनाथ संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश बापू निळ, रेवन्नाथ निकत, आशिष गायकवाड, रामभाऊ हाके, नितीन तकीक, शिवाजी कदम यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले, तर आभार रोकडे यांनी मानले.
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले सदस्य
अतुल बदर (साडे), शिल्पा पाटील (साडे), राजकुमार कोरे (पाथर्डी), अक्षय शेंडगे (गोयेगाव), अनिल पवार (हिवरवाडी), विजयसिंह मोहोळ (केम), नितीन निमगिरे (जेऊरवाडी), रेश्मा इंगोले (कोंढेज), बलभीम कांबळे (पोफळज), शिवाजी पिसाळ (झरे), लक्ष्मण खोमणे (गुलमोहरवाडी), दत्तात्रय सरडे (करंजे), सोनाली क्षीरसागर (केडगाव), भाग्यश्री बर्डे (रावगाव), संतोषकुमार जाधव (कोर्टी), मनोहरभाऊ लांडगे (कोंढार चिंचोली), गजेंद्र पोळ (शेटफळ), अक्षय घाडगे (तरडगाव), नितीन तकीक (वांगी), हनुमंत वीर (पिंपळवाडी), तानाजी पवळ (शेलगाव), सविता कांबळे (करमाळा), बिबीशन नागणे (केम) आणि शुभम वेदपाठक (साडे).

