📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव शहरातील नगरपंचायतीच्या कथित दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, कोंडवाडा रिकामा असतानाही जनावरे थेट महामार्गावर मुक्तपणे फिरत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
माहितीनुसार, नगरपंचायतीमार्फत कोंडवाड्याचा लिलाव करण्यात येतो. लिलावधारकाला मोकाट जनावरे कोंडवाड्यात ठेवण्याची जबाबदारी दिली जाते. मात्र, नगरपंचायतीकडून लेखी आदेश मिळाल्यानंतरच संबंधित व्यक्ती जनावरे कोंडवाड्यात पकडून ठेवू शकते. अशा आदेशांचा अभाव असल्याने सध्या अनेक मोकाट जनावरे शहरातील रस्ते व महामार्गावर फिरताना दिसत आहेत.
महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी जनावरे उभी राहत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यामागे मोकाट जनावरे हे प्रमुख कारण असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याउलट वाहतुकीसाठी ऑटो रिक्षांना जबाबदार धरले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने सोडवून कोंडवाडा कार्यान्वित करावा आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नगरपंचायतीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

