📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | परंडा | प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील वाटेफळ शिवारासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असून, या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या पिकांवर संकट निर्माण झाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून सोयाबीन, तूर, कापूस आदी खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
या पावसामुळे पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातही समाधानकारक पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

