
रायगाव (ता. करमाळा) | प्रतिनिधी :
आषाढी वारीनिमित्त रायगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मा. अमृता ताई वाघे यांनी पालखीचे पूजन करून वारकरी बांधवांचे स्वागत केले.
टाळ-मृदुंगाच्या निनादात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण रायगाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी, ग्रामस्थ, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी मा. अमृता ताई वाघे यांनी वारकरी बांधवांना शुभेच्छा देत वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगितले. वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणे हा मोठा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला करमाळा तालुका बालविकास अधिकारी किरण सुरवसे, गटविकास अधिकारी कदम साहेब, तहसीलदार ठोकडे मॅडम, मंडल अधिकारी राऊत साहेब, तसेच सर्जेराव मोळकर, सचिन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालखी सोहळ्यानिमित्त रायगाव ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती. उपस्थित मान्यवरांनी वारी परंपरेतील सेवा, समता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जपण्याचे आवाहन केले.
“ज्ञानोबा माऊली… तुकाराम!” या अखंड जयघोषात भक्तिमय वातावरणात पालखी पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.



