
अहिल्यानगर | प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगातही प्रामाणिकपणा व माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण अहिल्यानगर शहरात पाहायला मिळाले. हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करून आनंद कॉस्मेटिकचे संचालक धिरजजी संतोषजी कोठारी यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी राहुल देविचंद लोढा यांच्या पत्नी दाळमंडई येथील आनंद कॉम्प्लेक्समधील आनंद कॉस्मेटिक दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण नकळत खाली पडले. ही बाब रात्री सुमारे ११ वाजता त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर संपूर्ण रात्र घरात आणि इतर ठिकाणी शोधाशोध करूनही गंठण सापडले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद कॉस्मेटिकचे संचालक धिरजजी कोठारी यांनी राहुल लोढा यांच्याशी संपर्क साधून दुकानाबाहेर सोन्याचे गंठण सापडल्याची माहिती दिली आणि ते घेऊन जाण्याचे सांगितले.
त्यानुसार राहुल लोढा, त्यांच्या पत्नी, विनीत लोढा, प्रणिती लोढा, बाळूसेठ लोढा तसेच पोपट लोढा हे आनंद कॉस्मेटिक येथे पोहोचले. धिरजजी कोठारी यांनी सर्व खात्री करून सोन्याचे गंठण त्यांना सुरक्षितपणे परत दिले.
या प्रामाणिकपणाबद्दल लोढा परिवाराने धिरजजी कोठारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आनंद कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष प्रशांतसेठ मुथा तसेच गिरीषसेठ लुंकड उपस्थित होते.
या घटनेमुळे आजच्या काळातही प्रामाणिकपणा, विश्वास आणि माणुसकीची मूल्ये जपणारी माणसे समाजात असल्याचा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये पोहोचला.


