
पुणे/आळंदी | प्रतिनिधी
आळंदी तीर्थक्षेत्री इंद्रायणी नदीला ६ जुलै रोजी आलेल्या भीषण महापुरामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील प्रतिष्ठित दिंडी क्रमांक ४३ – श्री गोविंद महाराज केंद्र संस्था मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. महापुरात अन्नधान्याचा साठा, धार्मिक साहित्य, रोख रक्कम, वाहन, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इमारतीचे मोठे नुकसान झाल्याने संस्थेच्या वारीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष तथा भूमिदाता नानाजीभाई ठक्कर यांनी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. पाहणीवेळी माजी नगरसेवक मनोहर दिवाणे, नगरसेवक संतोष रायकर, विश्वस्त दशरथ कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पाहणीनंतर नानाजीभाई ठक्कर यांनी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याशी संपर्क साधून महापुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. या नैसर्गिक आपत्तीची गंभीर दखल घेऊन शासनाने तातडीने नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
संस्थेने प्रशासनाकडे दिलेल्या पंचनामा अर्जानुसार, आगामी आषाढी वारीसाठी सुमारे ६,००० वारकरी आणि भाविकांच्या २० दिवसांच्या भोजनाची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी साठवून ठेवलेले लाखो रुपयांचे अन्नधान्य महापुरात वाहून गेले. मंदिर, किचन, धार्मिक साहित्य, ग्रंथालय तसेच इमारतीच्या संरचनेचेही मोठे नुकसान झाले आहे.
पुराच्या पाण्यामुळे बाहेरील किचन शेड पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गॅस शेगड्या, फ्रिज, भांडी, साऊंड सिस्टिमसह अनेक महागडी उपकरणे निकामी झाली. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा यांसारखी धार्मिक वाद्ये तसेच ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथही खराब झाले आहेत.
याशिवाय पिण्याच्या पाण्याची बोअरवेल गाळाने बंद पडली असून १,००० लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. मुख्य कार्यालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, हिशोबाच्या फायली, पावती पुस्तके, संगणक आणि फर्निचरही चिखलामुळे निकामी झाले आहे.
देणगी स्वरूपात संस्थेकडे असलेली सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम पुराच्या पाण्यात वाहून गेली असून संस्थेची बोलेरो वाहनही पूर्णपणे निकामी झाले आहे. त्यामुळे संस्थेवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
वारकरी संप्रदायात सेवाभावी, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी ओळख असलेल्या श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला पुन्हा पूर्ववत उभे करण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी संस्थेचे कार्याध्यक्ष नानाजीभाई ठक्कर आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


