
परभणी | प्रतिनिधी
मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या जात पडताळणी प्रकरणांमध्ये सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत समाजबांधवांनी १० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (क्र. १) कार्यालयासमोर प्रतीकात्मक ‘टाळे ठोक’ आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा निर्णय परभणी व बीड जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत समाजाच्या प्रतिनिधींनी आरोप केला की, मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या संदर्भातील ब्रिटिशकालीन, निजामकालीन दस्तऐवज, गॅझेट, जनगणना नोंदी आणि संशोधनपर साहित्याचा पुरेसा विचार न करता केवळ जुन्या ‘कोळी’ नोंदींच्या आधारे अनेक प्रकरणे अवैध ठरवली जात आहेत.
समाजाच्या मते, अनुसूचित जमातींच्या यादीत क्रमांक २९ वर ‘कोळी महादेव’ आणि क्रमांक ३० वर ‘कोळी मल्हार’ या जमातींचा समावेश आहे. पुणे, ठाणे, नाशिक, नगर आणि रायगड जिल्ह्यांतील प्रकरणांमध्ये ‘कोळी’ नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र दिले जाते, मात्र मराठवाड्यातील प्रकरणांमध्ये त्याच नोंदी नाकारल्या जात असल्याने भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला.
याच मुद्द्यावर समाजबांधवांनी प्रश्न उपस्थित करत, “एकाच आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील समितीकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे निकष का?” असा सवाल उपस्थित केला.
बैठकीत सांगण्यात आले की, यापूर्वी मे महिन्यात महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या वतीने १४ दिवसांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाला ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपूनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने आता १० ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक ‘टाळे ठोक’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनात मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
बैठकीस रमेश पिठ्ठलवाड, गणेशराव सूर्यवंशी, अच्युतराव सोगे, किशोर सूर्यवंशी, रोहिदास एम्बलवाड, शंकर गंगाधरे, विश्वंभर मेकेवाड, गोविंद सोलेवाड, विठ्ठल बुधवारे, बंडू सौंदडे, राम चिंचलवाड, तुकाराम सोळंके, नागनाथ पोतलवाड, रामभाऊ वाघमारे, ॲड. राजू पिटले, कोंडीबा भंगे, रंगनाथ मामीलवाड, दादाराव नंदेवाड यांच्यासह महादेव कोळी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


