
सांगली | प्रतिनिधी
“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या उदात्त भावनेतून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO), सांगली जिल्हा टीमने यंदाच्या आषाढी वारीत सलग पाचव्या वर्षी विविध सेवाभावी उपक्रम राबवत हजारो वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा केली. संतपरंपरेचा वारसा जपत सामाजिक बांधिलकी, लोकसेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात. या प्रवासात वारकऱ्यांना आरोग्य, अन्न आणि विश्रांतीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज लक्षात घेऊन दि. १७ व १८ जुलै रोजी फलटण ते निंबळक (पालखी मार्ग) येथे WMO सांगली जिल्हा टीमने विविध सेवा उपक्रम राबवले.
उपक्रमांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी, आवश्यक औषधांचे वितरण, अन्नदान, ब्लँकेट वाटप, वारकऱ्यांच्या पायांना मलम लावणे, मसाज सेवा तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. दिवसभर सुरू असलेल्या या सेवेमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. स्वयंसेवकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता वारकऱ्यांची सेवा करत समाजापुढे सेवाभावाचा आदर्श निर्माण केला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजसेवेची मोठी संधी आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि हास्य हीच आमची खरी कमाई आहे. त्यामुळे दरवर्षी अधिक नियोजनबद्ध आणि व्यापक स्वरूपात हे उपक्रम राबवले जात आहेत.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. कोविड-१९ काळात औषधे व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमा अशा अनेक उपक्रमांद्वारे संस्था सातत्याने समाजसेवा करत आहे.
या सेवाभावी उपक्रमात देव मोरे, रवींद्र पाटील, अमोल कदम, वसंत सावंत, महेश मुळीक, सुहास चव्हाण, शुभम, महिंद्र, किरण, राज जगताप, उदयासिंग पाटील, मनीषा खराडे यांच्यासह WMO सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी, ॲडमिन टीम आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि हितचिंतकांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश जपत कार्य करणाऱ्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, सांगली जिल्हाची आज प्रेरणादायी सामाजिक संस्था म्हणून ओळख निर्माण झाली असून, भविष्यातही अशाच सेवाभावी उपक्रमांची अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.





