जामखेड | प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा भटक्या-विमुक्त सेलचे अध्यक्ष पांडुरंग माने यांनी रविवारी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जामखेड तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले.
पांडुरंग माने हे उत्तर महाराष्ट्रातील विमुक्त जाती-भटक्या समाजाचे नेतृत्व करत असून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय राहिले आहेत. जामखेड नगरपरिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी त्यांनी पाच दिवस आमरण उपोषण केले होते. तसेच जामखेड आगारासाठी नवीन एसटी बसची मागणी करत त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जामखेड आगाराला पाच नवीन बस उपलब्ध झाल्या होत्या.
याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रशासनामार्फत सुरू करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध सामाजिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवरही त्यांनी आंदोलने व जनजागृती उपक्रम राबवले आहेत.
यापूर्वी पांडुरंग माने यांनी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून काम केले होते. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना पांडुरंग माने म्हणाले, “भक्ती आणि शक्तीच्या अधिष्ठानाने प्रेरित होऊन जनसेवेचा वसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मी हा नवा प्रवास सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करणार आहे.”
यावेळी शिवसेना युवा नेते आकाश बाफना, तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, ज्येष्ठ नेते कैलास जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि समर्थक उपस्थित होते.
