परभणी | प्रतिनिधी :
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील रत्नापूर येथील टोल नाका सुरू झाल्यापासून मानवत व पाथरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल नाका व्यवस्थापकांना निवेदन देत स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी केली आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनानुसार, मानवत व पाथरी ही दोन्ही शहरे अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असल्याने व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि नोकरदार वर्गाची दोन्ही शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दैनंदिन कामकाजासाठी वारंवार टोल भरावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
शासनाच्या नियमानुसार टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या खासगी वाहनांना टोलमाफी अथवा मोफत पासची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, रत्नापूर टोल नाक्यावर हा नियम प्रभावीपणे राबविला जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मनसेने मानवत व पाथरी शहरातील स्थानिक खासगी वाहनधारकांना तात्काळ टोलमाफी किंवा मोफत पास देण्याची मागणी केली असून, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी टोल प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव काकडे, शहराध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, तालुकाध्यक्ष माऊली दहे, बालाजी पौळ, गोविंद घांडगे, दत्तराव शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

