बांबवडे | प्रतिनिधी
शेतीला पूरक आणि अनेक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या दुग्ध व्यवसायासमोर महागाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दुधाच्या दरात किरकोळ वाढ होत असताना पशूखाद्याच्या किमतीत मोठी वाढ होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दूध दरात अवघ्या १ रुपयाची वाढ होताच पशूखाद्याच्या गोणीमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत दरवाढ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या असमतोलामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून त्याचा थेट परिणाम दुग्ध व्यवसायावर होत आहे.
गाई-म्हशींचे संगोपन, औषधोपचार, चारा आणि पशूखाद्याचा वाढलेला खर्च यामुळे दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न खर्च भागविण्यासही अपुरे पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे छोट्या व मध्यम दूध उत्पादकांसाठी हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा राहिलेला नाही.
याबाबत संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, “दुधाचा दर वाढला की पशूखाद्याचे दर लगेच वाढवले जातात. मग शेतकऱ्याच्या हातात उरते काय? पशूखाद्याच्या वाढत्या किमतींवर शासनाने तातडीने नियंत्रण आणावे.”
दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी पशूखाद्याच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
