११ कर्मचाऱ्यांनी लीलया पेलली रेस्क्यूची आव्हानात्मक जबाबदारी!
५ वर्षांत ७० वन्यजीवांना मिळाले ‘नवजीवन’!
तालुका प्रतिनिधी
पांढरकवडा : मानवी वस्तीत वाट चुकलेले, शिकार्यांच्या जाळ्यात अडकलेले किंवा उघड्या विहिरीत पडून मृत्यूच्या दारात पोहोचलेले वन्यजीव… अशा संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठी पांढरकवडा वन विभागाची ‘रेस्क्यू टीम’ खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरत आहे. २०२० मध्ये स्थापन झालेल्या या विशेष पथकाने आपल्या तत्परतेच्या जोरावर अवघ्या पाच वर्षांत तब्बल ७० वन्यजीवांना सुरक्षित जीवनदान देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पांढरकवडा वन क्षेत्राच्या विविध भागांत अनेकदा वन्यजीव अपघातामध्ये जखमी होतात, तर काही वेळा शिकारीच्या सापळ्यात अडकतात. अशा वेळी ही रेस्क्यू टीम धावून जाते. पथकाने आतापर्यंत वाघ, बिबट्या, अस्वल, कोल्हा, मोर, नीलगाय, चितळ, माकड, ससा, रानडुक्कर, मांजर, रानकुत्रा, सायाळ आणि महाकाय अजगर यांसारख्या लहान-मोठ्या प्राण्यांना सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले आहे. वैद्यकीय उपचार करून या प्राण्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
वनक्षेत्र कार्यालयातील नियंत्रण कक्षाला रेस्क्यू संदर्भात कोणताही कॉल प्राप्त होताच, ही टीम अत्यंत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचते. उपवनसंरक्षक यशवंत बहाळे यांच्या कार्यकाळात या पथकाला अधिक बळ आणि आधुनिक गती मिळाली आहे. पथकातील सदस्यांची कौशल्ये अद्ययावत राहण्यासाठी उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित वर्कशॉप व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.
या पथकाच्या धडक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे पांढरकवडा परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यात मोठे यश आले असून, या पथकाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
बॉक्स
‘दुहेरी जबाबदारी’ लीलया पेलली!
या रेस्क्यू टीमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना. पथकात १ वनपाल आणि १० वनरक्षक असे एकूण ११ कर्मचारी आहेत. हे सर्व सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रातील बीट नियमित गस्त आणि संरक्षण कार्य सांभाळून रेस्क्यूची ही अतिरिक्त व आव्हानात्मक जबाबदारी पार पाडतात. वन विभागाने या कामासाठी एक स्वतंत्र चालक आणि सुसज्ज ‘स्पेशल रेस्क्यू व्हॅन’ उपलब्ध करून दिली आहे.









