मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून शहरातील कंधार रोडस्थित जायकवाडी वसाहत परिसरात असलेला पंचशील धम्मध्वज पुनर्स्थापित केल्यानंतर कांहीं भीमसैनिकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्हे मागे घेण्यात येऊन सदरील जागा विश्र्वशांती बुद्ध विहाराच्या नावे कायम करण्यात यावी सह इतर मागण्यांसाठी प्रमुख आंदोलक माजी नगरसेवक ॲड. पंचशील कांबळे यांनी पुनर्स्थापित धम्मध्वज स्थळी आमरण उपोषण आरंभ केले असून दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते.
शहरातील प्रमुख चर्चेत असलेल्या मूळ जायकवाडी वसाहत परिसरात गत तीस ते पस्तीस वर्षांपासून असलेला बौद्ध बांधवांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याच्या पंचशील धम्मध्वज भूमाफियांच्या सांगण्यावरून कांहीं मंडळींनी काढला होता. त्याविरुद्ध सकल बौद्ध समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. त्याप्रकरणी २३ जुलै रोजी तहसील कचेरीवर बौद्ध समाजाने भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून आल्याने अखेर तरुण भीमसैनिकांनी जायकवाडी येथे पूर्वी असलेल्या ठिकाणी दि. ८ रोजी पहाटे पंचशील धम्मध्वज पुनर्स्थापित केला.
तर सदर जमीन घेणाऱ्याकडून धम्मध्वज लावल्या प्रकरणी दि. ११ रोजी रात्री उशिरा पाच जणांविरुद्ध लोहा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात दि. १३ ऑगस्ट पासून प्रमुख आंदोलक माजी नगरसेवक ॲड. पंचशील कांबळे हे विविध मागण्यांसाठी पुनर्स्थापित धम्मध्वज स्थळी आमरण उपोषणास बसले आहेत. दि. १४ रोजी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या अशा – पाच भीमसैनिकावर करण्यात आलेली कार्यवाही तत्काळ मागे घेण्यात यावी, सन १९९२ पासून अस्तित्वात असलेल्या पंचशील ध्वजाची पूर्ववत त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्यात यावी, विश्वशांती बुद्ध विहारासाठी नियोजित जागेचे संरक्षण करून पूर्वस्थिती कायम ठेवण्यात यावी, नियमबाह्य पद्धतीने रद्द करण्यात आलेला नमुना क्र. ४७ तात्काळ पूर्ववत करण्यात येऊन संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करावी, शासकीय नोंदणीमध्ये फेरफार करणे व अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी व जागामलक यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, तहसीलदार यांनी बोलावलेल्या तहसीलदारांच्या दालनात घेण्यात आलेल्या बैठकीस अनुपस्थित संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी तसेच जिल्हास्तरीय किंवा विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सदरील अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
सदर पंचशील धम्मध्वज स्थळी सातव्या दिवसापर्यंत दैनंदिन शेकडो बौद्ध अनुयायी तसेच आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी भेट देत आहेत.










