शहादा,दि.15(का.प्र.)
शहादा तालुका भूमिअभिलेख कार्यालयात मागील तीन वर्षांपासून उपअधीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे आणि मुख्य प्रशासकीय पद रिक्त असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे पद त्वरित भरण्यात यावे, अशी आग्रही मागणी शहादा पालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ.माधवी मकरंद पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात सौ.माधवी मकरंद पाटील यांनी नमूद केले आहे की, शहादा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील एक महत्त्वाचा व मोठा तालुका आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून भूमिअभिलेख कार्यालयात पूर्णवेळ उपअधीक्षक नसल्यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाज पूर्णपणे मंदावले आहे. या महत्त्वाच्या अधिकाऱ्याच्या अभावामुळे जमिनींच्या मोजणीची प्रकरणे, शेतजमिनींचे वाद, फेरफार नोंदी तसेच अपिलाची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
उपअधीक्षकांची स्वाक्षरी आणि मंजुरी आवश्यक असणारी शेकडो कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे शेतकरी, मालमत्ताधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काच्या कामासाठी कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागत असून त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभावामुळे प्रशासकीय कामकाजावर योग्य ते नियंत्रण राहिले नसून याचा नाहक फटका सामान्य जनतेला बसत आहे.शहादा भूमिअभिलेख कार्यालयातील ही गंभीर परिस्थिती विचारात घेऊन तेथे त्वरित पूर्णवेळ उपअधीक्षक यांची नियुक्ती करावी किंवा तात्पुरत्या स्वरूपात सक्षम अधिकाऱ्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सौ.पाटील यांनी निवेदनात केली आहे.दरम्यान, या निवेदनाच्या प्रती जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख (पुणे), नंदुरबारचे जिल्हाधिकारी, शहादा विधानसभेचे आमदार आणि जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख (नंदुरबार) यांनाही पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. महसूल मंत्री या विषयाची तातडीने दखल घेऊन शहादावासीयांना दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











