शहादा,दि.२४(का.प्र.)
लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शहादा तालुक्यातील तिन्ही मंडळांची संयुक्त ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण’ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आगामी टप्प्यातील कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थित बीएलए-२ कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, “आता एसआयआर प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सर्व बीएलए-२ प्रतिनिधींनी प्रारुप मतदार यादीची बारकाईने व व्यवस्थित पाहणी करावी. तालुक्यातील एकाही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांना न्याय मिळवून द्यावा.
“भाजप जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, एसआयआरचा हा टप्पा अत्यंत संवेदनशील असून, अद्याप प्रलंबित असलेली सर्व कामे स्वतः लक्ष घालून वेळेत पूर्ण करून घ्यावीत.तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, “एसआयआरचे काम अजून संपलेले नाही. आता दावा आणि हरकती नोंदवण्याचा सर्वात महत्त्वाचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे सर्व बीएलए-२ यांनी सतर्क राहून प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवावे.”
बैठकीचे सूत्रसंचालन शहादा शहराध्यक्ष तथा नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. बैठकीस पक्षाचे राज्य परिषद सदस्य विनोद जैन,शहर सरचिटणीस अजबसिंग गिरासे, प्रशांत कदम, प्रशांत कुलकर्णी, लोणखेडा मंडळ अध्यक्ष नितीन पाटील, म्हसावद मंडळ अध्यक्ष विश्वास ठाकरे, तसेच वरिष्ठ नेते नारायण ठाकरे व बळीराम दादा पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.याशिवाय शहादा शहरातील व तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध मोर्चांचे अध्यक्ष, महिला कार्यकर्त्या आणि तालुक्यातील सर्व बीएलए-२ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







