बांबवडे (प्रतिनिधी):
तालुका शाहूवाडी येथील बांबवडे ग्रामपंचायतीच्या कारभारात वॉटर मीटर बसविण्याच्या नावाखाली सुमारे ₹६,३१,७७८/- रुपयांचा मोठा अपहार करण्यात आला असून, या गैरप्रकाराची शासनाने सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी शाहूवाडी पंचायत समितीचे गट नेते श्री अभयसिंह चौगुले यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि गटविकास अधिकारी (BDO) यांच्यासह प्रशासनाला सविस्तर निवेदने देऊन चौकशीची मागणी केली आहे.
नेमका प्रकार काय?
याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना श्री अभयसिंह चौगुले म्हणाले की, सन २०२२ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कारभारी व ग्रामसेवक यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात वॉटर मीटर बसवण्यासाठी ₹१०,६९,२३९/- रकमेचे एस्टीमेट (अंदाजपत्रक) तयार करून प्रशासकीय परवानगी मिळवली.
मात्र, हे वॉटर मीटर खरेदी करण्यासाठी:
- कोणतीही निविदा (Tender) प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
- वॉटर मीटर खरेदीचे बिल उपलब्ध नाही.
- प्रत्यक्षात गावात एकही वॉटर मीटर बसवण्यात आला नाही.
असे असतानाही सुमारे ₹६,३१,७७८/- चा निधी खर्च दाखवण्यात आला आहे. सदर वॉटर मीटरचे बिल सोनवडे (ता. शाहूवाडी) येथील आकाश ज्ञानदेव पाटील यांच्या नावे काढण्यात आले आहे. यामध्ये दलित वस्तीसाठी ₹२,०७,५७४/- आणि सर्वसाधारण वर्गासाठी ₹४,२४,२०४/- ची रक्कम अदा करण्यात आली आहे.
प्रस्ताव रद्द झालेला असतानाही बिलांची रक्कम अदा!
विशेष म्हणजे, सदर बिलांची रक्कम अदा करण्यापूर्वीच, २७ जून २०२२ रोजी हा प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करण्यात आला होता. तरीसुद्धा प्रस्ताव रद्द झालेला असताना २७ ऑक्टोबर २०२२ आणि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी कंत्राटदाराला ही रक्कम अदा करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीत नेमका कसला कारभार सुरू आहे आणि यामागे कोणाचे ‘गौडबंगाल’ आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ग्रामसभेत फुटला भांडोफोड
१४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत आयत्या वेळच्या विषयांतर्गत वॉटर मीटरचा मुद्दा उपस्थित झाला होता. “या प्रकरणाची चौकशी करूया,” असे आश्वासन दिल्यानंतर जेव्हा याबाबत सखोल चौकशी करण्यात आली, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे अभयसिंह चौगुले यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी उपसरपंच दीपक निकम, अमर निकम यांसह स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






