बांबवडे (प्रतिनिधी) :
बांबवडे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. बांबवडे-कोकरूड मार्गालगत असलेल्या मध्यवर्ती मानवी वस्तीत भरदिवसा बिबट्याने थेट घराच्या आवारात शिरून पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली.
भरदिवसा कुत्र्यावर झडप
बांबवडे येथील आनंदा दिलीप निकम यांचे घर बांबवडे-कोकरूड रस्त्यालगत आहे. दुपारी सुमारे एकच्या सुमारास अचानक बिबट्या निकम यांच्या घराच्या मागच्या बाजूस आला आणि त्याने घरात असलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप घातली. निकम यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने बिबट्याने सुरुवातीला कुत्र्याला सोडून पलायन केले. मात्र, काही मिनिटांतच बिबट्या पुन्हा घटनास्थळी परतला आणि जखमी कुत्र्याला उचलून शेजारील उसाच्या शेतात घेऊन गेला. निकम यांच्या पत्नी घराच्या अगदी समोर असताना हा प्रकार घडल्याने त्यांची मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी प्रसंगावधान राखून घरात धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बिबट्याचा बंदोबस्त कधी?
उसाची शेती, दाट झाडी आणि मानवी वस्तीचा विस्तार यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत असून तो वारंवार मानवी वस्तीकडे येत आहे. “आज कुत्र्यावर हल्ला झाला, उद्या एखाद्या माणसावर हल्ला झाल्यावरच वन विभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून पकडण्यात यावे आणि परिसर भयमुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिक्रिया :
“शाहूवाडी तालुक्यातील डोंगरी भागासह अन्य भागांत जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. भविष्यात मानवासही धोका निर्माण होऊ शकतो. वन विभागाने लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तात्काळ उपाययोजना करावी; अन्यथा वन विभागाच्या गलथान कारभाराविरोधात वेगळा विचार करावा लागेल.”
— सौ. राजकुंवर गायकवाड (जि. प. सदस्या)
“वन विभागातर्फे परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यात अद्याप बिबट्याची हालचाल दिसून आलेली नाही. सध्या पाहणी सुरू आहे. अशी घटना पुन्हा दिसून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.”
— उज्ज्वला मगदूम (वनपरिक्षेत्र अधिकारी, शाहूवाडी)







