मुलचेरा :
मुलचेरा, दि. २८ ऑगस्ट २०२६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मुलचेरा येथे कर्जमाफीच्या रकमेबाबत अनियमितता झाल्याचा आरोप करीत मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कर्जखात्यातील थकीत मुद्दल व व्याजाच्या रकमेपेक्षा कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दर्शविण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये मुद्दल रकमेपेक्षा कमी रक्कम समाविष्ट करण्यात आल्याचा, तर काही शेतकऱ्यांच्या व्याजाची रक्कम कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या संदर्भात बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, यादीतील चुका शासन स्तरावर झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच यादीमध्ये समाविष्ट असलेली उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः भरावी लागेल, असे सांगण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
यामुळे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा अपेक्षित लाभ मिळण्याऐवजी अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी मा. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुलचेरा येथील संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची तपासणी करावी, प्रत्यक्ष थकीत मुद्दल व व्याज आणि कर्जमाफी यादीतील रकमेची पडताळणी करावी तसेच पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
निवेदनासोबत मा.डॉ.अजय भाऊ कंकडालवार माजी जिल्हा अध्यक्ष तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, कालिदास कुसनाके तालुका अध्यक्ष मुलचेरा आदिवासी काँग्रेस कमेटी संबंधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असून, रामू सोमा तोरे (धन्नूर), सुधाकर गुड्डी सेंडामके (धन्नूर) तिरमा गुड्डी सेंडमाके,शालीक सेंडमाके सरपत नैताम, बिचेंगा सिडाम काकरगट्टा यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
“कर्जमाफी योजनेतील रकमेची तफावत तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.












