शहादा,दि29(का.प्र.)
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या तापी खोरे विकास प्रकल्पाला भागातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देण्याबाबत शासन स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे. या संदर्भात तळोदा-शहादा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेशदादा पाडवी यांनी शासनाकडे सातत्याने आणि आग्रही पाठपुरावा केला होता. या मागणीची शासनाने दखल घेतली असून लवकरच यावर धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार राजेशदादा पाडवी यांनी तापी खोरे विकास प्रकल्पाला अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देऊन त्यांच्या लोकसेवेचा व कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करावा, अशी मागणी राज्य शासनाकडे लावून धरली होती. या मागणीची शासन स्तरावर अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
“सदर बाब धोरणात्मक स्वरूपाची असून सध्या शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाचे धोरण अंतिम झाल्यानंतर आमदार राजेशदादा पाडवी यांच्या विनंतीनुसार या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे जलसंपदा मंत्र्यांनी कळविले आहे.माजी आमदार अण्णासाहेब पी. के. पाटील यांनी तापी परिसराच्या सिंचनासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा हा वारसा आणि स्मृती जपण्यासाठी तापी खोरे विकास प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही संपूर्ण परिसराची आणि लोकभावना होती.
हीच लोकभावना लक्षात घेऊन आमदार राजेशदादा पाडवी यांनी शासन दरबारी वारंवार पत्रव्यवहार आणि बैठकांच्या माध्यमातून हा विषय लावून धरला होता.आमदार पाडवी यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि प्रयत्नांतील गांभीर्यामुळे हा महत्त्वपूर्ण विषय आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.शासनाकडून धोरणात्मक मंजुरी मिळताच तापी खोरे विकास प्रकल्पाला अण्णासाहेबांचे नाव देण्याची औपचारिक घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.तापी खोरे विकास प्रकल्पाला अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव मिळण्याच्या मार्गातील अडसर दूर होत असल्याने आणि शासनाकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने तळोदा व शहादा तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि आम नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे. आमदार राजेशदादा पाडवी यांच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आणि जनभावनेचा आदर केल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.











