तालुका प्रतिनिधी : रामेश्वर स्वामी
बार्शी : तालुक्यातील तडवळे परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी व नागरिक चिंतेत आहेत. पावसासाठी विविध उपाय केले जात असताना, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या प्रयोगानुसार तडवळे येथे ओल्या झाडांच्या फांद्या व मीठ टाकून त्या जाळण्याचा प्रयोग करण्यात आला.
या प्रयोगातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे वातावरणातील बाष्पीभवन होऊन वाफ तयार होते आणि त्यातून ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडण्यास मदत होते, असा स्थानिकांचा समज असल्याने हा प्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पावसाअभावी परिसरातील शेतकरी चिंतेत असून खरीप पिकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांनी या प्रयोगाकडे आशेने पाहिले. दरम्यान, अशा स्थानिक प्रयोगांमागील वैज्ञानिक दावे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तपासणे आवश्यक असल्याचेही जाणकारांचे मत आहे.








