प्रदिप ताजने
पातूर | प्रतिनिधी |
यावर्षी मान्सून अत्यंत कमजोर असल्याने हवामान तज्ञांचे पावसाचे सर्व अंदाज चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही तज्ञाच्या अंदाजावर विश्वास न ठेवता ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी तात्काळ आपल्या पिकांना पाणी देणे सुरू करावे, असे आवाहन श्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुका चे रवि सोनोने यांनी केले आहे.
सध्या पातूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. पिके माना टाकू लागली असून काही शेतकऱ्यांची पिके वाळून जात आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, मात्र वेळेवर पाऊस न झाल्याने पीक करपण्याच्या स्थितीत आहे.
“दररोज वेगवेगळे हवामान तज्ञ पावसाचे अंदाज देत आहेत, पण प्रत्यक्षात पाऊसच होत नाही. या अंदाजावर अवलंबून राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक जाईल. ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल, शेततळे किंवा इतर पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी तात्काळ पिकाला पाणी चालू करावे. ज्यांच्याकडे पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, त्यांचा खरोखरच इलाज नाही,” अशी खंत सोनोने यांनी व्यक्त केली.
शासनाने देखील या परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.







