करमाळा तालुक्यामध्ये ‘टीव्हीएस फायनान्स अँड क्रेडिट’ (TVS Credit Services) कंपनीच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक अत्यंत त्रस्त झाले आहेत. वाहनांचे सर्व कर्ज हप्ते वेळेत आणि पूर्ण भरूनही साध्या ‘नो-ड्यूज दाखल्यासाठी’ (NOC) ग्राहकांना करमाळ्यातून सोलापूर कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून, कंपनीकडून ग्राहकांची उघडउघड आर्थिक व मानसिक पळवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.
करमाळा तालुका हा सोलापूर शहरापासून तब्बल १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. स्थानिक पातळीवर करमाळ्यात फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कर्ज वाटप करताना सर्व सेवा दारात देण्याचे दावे करतात. मात्र, कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर आवश्यक असलेला ‘नो-ड्यूज’ किंवा ‘एनओसी’ दाखला देण्यासाठी ग्राहकांना थेट सोलापूर येथील मुख्य कार्यालयात जाण्यास सांगितले जाते. एका साध्या कागदासाठी नागरिकांना कामधंदा सोडून, आर्थिक खर्च करत सोलापूरला खेटे घालावे लागत आहेत.
याशिवाय, सोलापूर कार्यालयात गेल्यावरही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ करणे, सिस्टीम बंद असल्याचे सांगणे किंवा विनाकारण ताटकळत ठेवणे अशा प्रकारांना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. वेळेत एनओसी न मिळाल्यामुळे अनेक ग्राहकांना आपल्या वाहनांची आरटीओ (RTO) कामे किंवा हस्तांतरण करता येत नाही.
करमाळ्यातील स्थानिक ग्राहकांची ही पिळवणूक आणि पळवणूक तात्काळ थांबवून नो-ड्यूज दाखले करमाळ्यातच उपलब्ध करून द्यावेत, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून केली जात आहे. प्रशासनाने आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल न घेतल्यास फायनान्स कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.










