राहुल राठोड
ता. प्रतिनिधी…
खामगाव : राज्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत भोजन मिळावे, अशी तरतूद असतानाही अनेक ठिकाणी रुग्णांना भोजन मिळत नसल्याचा आरोप संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ गोपाळराव घुले यांनी केला आहे. काही रुग्णालयांमध्ये भोजन दिले जात असले तरी त्याचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रारही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खामगाव येथील संघर्ष ग्रुपकडून लोकसहभागातून रुग्णांसाठी मोफत टिफिन सेवा सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक रुग्णालयांमधून भोजनासाठी संघर्ष ग्रुपकडे दूरध्वनीद्वारे मागणी केली जात असल्याने शासनाच्या योजनेचा लाभ संबंधित रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
योजनेअंतर्गत रुग्णालयांना भोजनासाठी शासनाकडून अनुदान मिळत असल्यास त्यामध्ये गैरव्यवहार होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील योजनेअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना तातडीने भोजन उपलब्ध करून द्यावे, तसेच वितरित करण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाची तपासणी करून निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच योजनेअंतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ‘रुग्णांना मोफत भोजन देण्यात येते’ असा फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संघर्ष ग्रुपने केली आहे.
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास २ सप्टेंबर २०२६ पासून खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघर्ष ग्रुपने दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
प्रतिलिपी : आरोग्यमंत्री, पालकमंत्री बुलढाणा, कामगार मंत्री, जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच खामगाव शहर पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.










