देवस्थान-मठ ट्रस्ट जमीन प्रश्न, शेतकरी-शेतमजूर हक्क आणि राज्य अधिवेशनाची दिशा ठरविण्यात आली….
आजरा – ३० ऑगस्ट २०२६ : कोल्हापूर शहरात दिनांक ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने आजरा तालुक्याचा आज संघर्ष व लढा मेळावा संपन्न झाला. अखिल भारतीय किसान सभा, आजरा तालुका याने आयोजित केलेल्या या मेळाव्यात शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, कामगार व ग्रामीण कष्टकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा श्रमिक पतसंस्था, जिजामाता कॉलनी, आजरा येथे रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता झाला. मेळाव्याचे अध्यक्षस्थान कायदेतज्ज्ञ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अधिवक्ता दशरथ दळवी यांनी भूषविले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अधिवक्ता दशरथ दळवी यांनी
अखिल भारतीय किसान सभेच्या दीर्घ संघर्षपरंपरा सांगत.शेतकऱ्यांच्या जमीन, पाणी, पीक व कर्ज प्रश्नांपासून ते शेतीमालाला रास्त व हमीभाव मिळावा यासाठी किसान सभेने सातत्याने लढे उभारले आहेत. शेतकरी कर्जमुक्ती, वीज व सिंचन, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, ऊस उत्पादकांचे प्रश्न, दूध व इतर शेतीमालाचे भाव, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, वनहक्क, जमीन संपादन तसेच शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटनेने सातत्याने संघर्ष केला असल्याचे मेळाव्यात अधोरेखित करण्यात आले.
तसेच त्यांनी शेवटी शेतकरी व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कायदेशीर व संघटनात्मक संघर्ष एकत्रितपणे पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांनी देवस्थान-मठ ट्रस्ट जमीन प्रश्नातील कायदेशीर बाजू स्पष्ट करताना शेतकऱ्यांनी एकजूट राहून लढा उभा करण्याचे आवाहन केले.
मेळाव्यात बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक व जिल्हा सहसचिव संग्राम सावंत म्हणाले,आजरा तालुका व जिल्हा कोल्हापूरमधील देवस्थान तसेच मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क, इतर शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर, कामगार, भूमिहीन, बेघर यांच्या समस्या आणि गावठाणवाढ या प्रश्नांबाबत पुढील लढ्याची ठोस दिशा निश्चित करून लढा देणार तसेच देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क व संरक्षण मिळेपर्यंत निकराचा लढा करणार आहोत.यासाठी अखिल भारतीय किसान सभेला साथ द्या.यासाठी कोल्हापूर शहरात येत्या ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला आजरा तालुका व परिसरातील शेतकरी-शेतमजूरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कॉ.संजय घाटगे म्हणाले,संबंधित जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची मांडणी केली आणि हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले.राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनात्मक तयारी, शेतकरी प्रश्नांची मांडणी आणि पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय किसान सभेचे आजरा तालुका नेते कॉ. शिवाजी गुरव यांनी तालुक्यातील शेतकरी-शेतमजूर प्रश्नांची प्रत्यक्ष स्थिती मांडली आणि स्थानिक लढ्यांना संघटित स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली.
आजरा तालुका अध्यक्ष, भाकपा माले व गिरणी कामगार संघटना यांचे कॉम्रेड शांताराम पाटील यांनी शेतमजूर, कामगार व भूमिहीन बांधवांच्या प्रश्नांना शेतकरी चळवळीशी जोडून एकत्रित लढा उभारण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
मेळाव्यात पुढील ठराव केले…
1)देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करावेत, अन्यायकारक बेदखली व शोषणाला आळा घालावा.
2)शेतीमालाला उत्पादनखर्च अधिक रास्त नफा इतका हमीभाव मिळावा.
3)कर्जमुक्ती व पीक विम्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
4) सिंचन, वीज, पाणी वाटप व नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत.
5) शेतमजूर, भूमिहीन, बेघर व कामगारांच्या हक्कांसाठी गावठाणवाढ व रोजगार हमी प्रभावी व यशस्वी करावी.
6) ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला तालुक्यातील शेतकरी-कष्टकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तिन्ही तालुक्यात प्रचार प्रसार करणार..
वाढता शेती उत्पादन खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, शेतकऱ्यांवरील वाढते कर्ज, हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती, सिंचन व पाण्याचे प्रश्न, ग्रामीण बेरोजगारी आणि शेती क्षेत्रासमोरील विविध संकटांमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली असल्याचे मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आजरा येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला सुरेश शिंगटे,ज्योतीराम राणे,श्रावण चौगुले वंचित युवाचे नेते दत्तात्रय कांबळे, संतोष मासोळे, अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते संभाजी मोहिते, शिवाजी गिलबिले, भगवान सूर्यवंशी, राजेंद्र देशमुख, रामा कांबळे, संतोष माने, सचिन लोहार, शुभम कांबळे यांच्यासह शेतकरी शेतमजूर व कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय किसान सभा
आजरा तालुका, जिल्हा कोल्हापूर.




