शहादा,दि.02(का.प्र.)
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली. या निमित्ताने महाविद्यालयातील अर्थ, वाणिज्य व नियोजन मंडळाचे उद्घाटन अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल हे होते.
अर्थ, वाणिज्य व नियोजन मंडळाकडून आयोजित या व्याख्यानमालेत अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत हरमकर यांनी ‘लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी व संविधान विषयक कार्य’ या विषयावर प्रमुख व्याख्यान दिले.
उद्घाटनपर भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अथक प्रयत्न केले. शिक्षणाबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांचे संघटन बांधले. आजच्या आधुनिक व्यवस्थेने शिक्षण तसेच शेती क्षेत्राचे महत्त्व कमी होऊ देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत हरमकर यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत व जीवनात सुधारणा होणार नाही.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी शेतीमध्ये सुधारणा केल्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. भारतात ७० टक्के शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या या संपूर्ण देशाच्या समस्या आहेत, हे त्यांनी ओळखले होते. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून देशातील शेती उत्पादनाच्या वाढीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण उपाययोजना आखल्या.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी स्पष्ट केले की, युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अशा व्याख्यानांची अत्यंत आवश्यकता आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती क्षेत्रात दिलेले योगदान अनमोल आहे.त्याचप्रमाणे सातपुड्याच्या या दुर्गम परिसरात सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतीवर आधारित उद्योगांसाठी मोठे कार्य उभे केले आहे.या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. डी. शिंदखेडकर, अर्थ, वाणिज्य व नियोजन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एम. गांगुर्डे, सचिव प्रा. एस. एस. पवार व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश निकम हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. एम. गांगुर्डे यांनी केले, प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. अविनाश निकम यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन प्रा. एस. एस. पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. एल. भालेराव, डॉ. जी. एस. गवई, डॉ. खुमानसिंग वळवी, डॉ. आर. एस. माळी, डॉ. जगदीश पाटील, प्रा. शीतल पाटील, प्रा. मोनिका पटेल, प्रा. ईश्वरी ठाकरे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.







