धड़गाव प्रतिनिधी
चव्हाणवाडी, धुळे | दि. २ सप्टेंबर २०२६
समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण महिना प्रारंभ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोपाळ लोहार होते. प्रमुख पाहुणे म्हणून साधनव्यक्ती श्रीमती अर्चना वाडीले, अंगणवाडी शिक्षिका श्रीमती मंगला वाघ तसेच प्रा. डॉ. राहुल आहेर, वरिष्ठ शिक्षक श्री. धनराज पाटील, क्षेत्रकार्य व प्रकल्प समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे यांची उपस्थिती होती. यावेळी क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक श्रीमती अर्चना वाडीले आणि श्रीमती मंगला वाघ यांनी विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्त्व समजावून सांगताना घरात सहज उपलब्ध असलेल्या डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, अंडी तसेच स्थानिक पौष्टिक पदार्थांचा दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा, असे आवाहन केले. संतुलित आहारामुळे शरीराची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री. गोपाळ लोहार यांनी सांगितले की, “पोषण हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी योग्य व संतुलित आहार आवश्यक आहे. केवळ पोट भरणे म्हणजे पोषण नव्हे; तर शरीराला आवश्यक असणारी प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणे म्हणजे खरे पोषण होय.” विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात पोषणविषयक सवयी अंगीकाराव्यात, असेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थिनी रुषा वसावे हिने केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विपुल वेडगा यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विपुल वेडगा, रुषा वसावे, मेहेक वळवी, रूपाली ठाकरे, महेश बाविस्कर, पवन टिळे आणि भावेश वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.








