(प्रतिनिधी: शेख मोईन)
किनवट:गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी महिलेचा विनयभंग व जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात तक्रार नोंदविण्यास विलंब केल्याचा आरोप असलेले किनवट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. दरम्यान, उर्वरित मागण्यांवर आठ दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पीडित महिलेने नियोजित आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित केले.
दि. २० ऑगस्ट रोजी गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात बालाजी केंद्रे (रा. कोपरा) याने आपला विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने केली होती तक्रार देण्यासाठी किनवट पोलीस ठाण्यात गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आरोप महिलेने केला होता. आमदार भीमराव केराम यांनी पोलिसांकडे आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आरोपीविरुद्ध विनयभंग व ट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कराड यांना या प्रकरणात सहआरोपी करावे, तसेच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी पीडित महिलेने १ सप्टेंबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मागण्या मान्य न झाल्यास २ सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.
यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी आंदोलनस्थळी जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची माहिती देत, उर्वरित मागण्यांबाबत आठ दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे महिलेने आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित केले. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हाती घेतल्याची माहिती आहे.
पीडित महिलेला लेखी आश्वासन देताना उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम, विकास कुडमते प्रा. विजय खुपसे, शेषेराव कोवे, प्रा. किशन मिरासे, गोपीनाथ बुलबुल व ईतर.
या प्रकरणात आमदार भीमराव केराम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी विकास कुडमते, प्रा. विजय खूपसे, शेषेराव कोवे, प्रा. किशन मिरासे आणि गोपीनाथ बुलबुले यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.




