बळीराजावर मोठे संकट; कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण(प्रतिनिधी) |
पातूर तालुक्यातील आलेगाव, गोळेगावसह संपूर्ण शेतशिवारात प्रदीर्घ पावसाच्या दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद, मूग, ज्वारीसह इतर खरीप पिके पाण्याअभावी वाळत आहेत.
सध्या पिके ऐन फुलोऱ्याच्या आणि कळी धरण्याच्या संवेदनशील अवस्थेत असताना पाण्याचा तीव्र ताण बसला आहे. परिणामी सोयाबीन, कपाशी, मका आणि तूर या पिकांची फुले व कळ्या गळून जमिनीवर पडत आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. कडक ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपुष्टात आला आहे.
जुलै अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या होत्या. हजारो रुपये खर्च करून सोने पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजावर निसर्गाने घाला घातला आहे. कोरडवाहू शेतीसह बागायती क्षेत्रातही विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गोळेगाव परिसरात परिस्थिती अधिक भीषण असून फुले-कळ्या गळून संपूर्ण पीक उध्वस्त झाले आहे.
विशेष म्हणजे, इतके मोठे नुकसान होऊनही अद्याप पातूर कृषी व महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शासनाने तात्काळ कृषी व महसूल विभागामार्फत शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २५% अग्रीम (आगाऊ) नुकसान भरपाई तात्काळ लागू करून आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त हाक आलेगाव-गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.




