पाथरीत सुमारे ५० किलो पाकिटे उघड्यावर; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
पाथरी : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील मसाला मुदत संपल्यानंतर चक्क रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी शहरात १ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. फायर ब्रिगेडसमोरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कांदा-लसूण मसाल्याची पाकिटे आढळून आल्याने शालेय पोषण आहाराच्या साठवणूक व वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर शिक्षण विभागाची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजुर्गे आणि पाथरीचे गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी अंदाजे ५० किलो मसाल्याची पाकिटे आढळून आली. संबंधित पाकिटांवरील मुदत जानेवारी/फेब्रुवारी २०२६ तसेच जुलैपर्यंत संपलेली असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला हा साठा मुदत संपेपर्यंत नेमका कुठे होता, त्याची वेळोवेळी तपासणी झाली का, मुदत संपलेली पाकिटे शाळांमध्येच पडून होती का आणि अखेर ती रस्त्यावर कोणी आणून टाकली, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, मुदत संपलेला मसाला विद्यार्थ्यांच्या आहारात जाण्यापूर्वीच निकामी झाला की मुदत संपल्यानंतरही तो साठवून ठेवण्यात आला होता, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित योजनेतील साठ्याबाबत निष्काळजीपणा झाला असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
३३ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
रस्त्यावर पोषण आहारातील मसाल्याची पाकिटे आढळून आल्यानंतर पाथरी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने शहरातील ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक खुलासा न मिळाल्यास प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
दोषींवर कारवाई प्रस्तावित : मुकेश राठोड
“रस्त्यावर पोषण आहाराची पाकिटे सापडणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला असून शहरातील संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल,” अशी माहिती गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड यांनी दिली.
जबाबदारी निश्चित होणार का?
शालेय पोषण आहाराच्या साठवणुकीपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत वितरणापर्यंतच्या संपूर्ण व्यवस्थेवर या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मसाला मुदतबाह्य होईपर्यंत तो कुठे होता आणि मुदत संपल्यानंतर रस्त्यावर कसा पोहोचला? याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. केवळ घटनास्थळाची पाहणी आणि नोटिसांपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता संबंधित साठा कुठून आला, कोणाच्या ताब्यात होता आणि तो रस्त्यावर कोणी टाकला, याची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.



