“संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
या वर्षी मानवत तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असून गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे ताण दिला आहे. यामुळे शेतातील पिकांची अवस्था अत्यंत नाजूक झाली असून उभी पिके करपून जात आहेत. या पार्श्वभूमीवर मानवत तालुक्यात तत्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पावसाच्या अभावामुळे पिके करपून गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून त्यांना रोजीरोटी भागवणे देखील कठीण झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अत्यंत किचकट अटी लादल्यामुळे बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे कोणतीही अट न लावता सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
शासनाने मानवत तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ७०,००० रुपयांची मदत जाहीर करावी. अन्यथा येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मानवत तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे तहसीलदार, मानवत यांना सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री गोविंद घाडगे, राजेभाऊ होगे, सुरज काकडे पाटील, हनुमान मस्के, अमोल भिसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









