रिसोड (प्रतिनिधी ) सारथी महाराष्ट्राचा न्यूज
रिसोड शहरासह परिसरातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी वाशीम तालुक्यातील अडोळ धरणातून शेती व इतर औद्योगिक कारणांसाठी होणारा पाणी उपसा तात्पुरता थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रिसोड शहर सरचिटणीस भारत जगन्नाथ गुंजकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २५ ऑगस्ट रोजी रिसोड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केले आहे की, अडोळ धरणातून रिसोड शहर तसेच रिठद व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या धरणात केवळ सुमारे ३५ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यास पुढील वर्षभर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपसा सुरू राहिल्यास दर महिन्याला जलसाठ्यात मोठी घट होऊन आगामी काळात रिसोड शहर व गावांना पाणीपुरवठा करणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत शेती व औद्योगिक वापरासाठीचा पाणी उपसा तात्पुरता स्थगित करावा, तसेच शहरासाठी मोठी पाणी साठवणूक व्यवस्था उभारून आगामी काळासाठी नियोजन करावे, अशी मागणी गुंजकर यांनी केली आहे
.









