-प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे
दोंडाईचा (प्रतिनिधी)- “संगणकाने मानवी जीवनात प्रवेश केल्यापासूनच शिक्षकांचे अध्यापनातील स्थान कमी होत असल्याचे जसे सांगितले जात होते तसेच आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिक्षकाचे स्थान कृत्रिम बुद्धिमत्ता घेणार अशा प्रकारची विचारसरणी समाजात असलेली पहावयास मिळत आहे. पण प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाचे स्थान अबाधितच आहे आणि राहणार आहे. कारण तंत्रज्ञान किती प्रगत झाले तरी शिक्षकांकडून मिळणारा अप्रगट स्नेह, संवेदनशीलता, आपुलकी, निर्व्याज भावनांची देवाण-घेवाण आणि मायेचा स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्ता देऊ शकणार नाही” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी शिक्षक दिनी आयोजित कार्यक्रमात केले. श्रीमंत राजे दौलत सिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या भूमिकेतून बी.एड. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. दुसऱ्या सत्रात माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचे स्वागत केले. प्रा. एस. एम. ठाकरे यांनी प्रास्ताविकातून राधाकृष्णन यांचा जीवन परिचय करून दिला तसेच कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली. रत्नाबेन इंगळे, पुष्पांजली गावित, कामिनी बागुल यांनी शिक्षक दिनावर आधारित अनुभव कथन केले. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय वर्षात प्रथम ते पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रथम वर्षातील चेतना दातेराव, पुष्पांजली गावित, रत्नाबेन इंदवे, हर्षाली माळी आणि द्वितीय वर्षातील प्राची कुलकर्णी, कामिनी बागुल, प्राजक्ता गिरासे, नीता पाटील, पूजा पाटील व शुभांगी कंखर यांचा समावेश होता. प्रमुख वक्ते प्रा.डॉ. प्रवीण पाटील यांनी ‘शिक्षकांचे महत्त्व’ या विषयावर मनोगत सादर केले. त्यांनी सांगितले की, “आदर्श जीवन जगण्याचे कौशल्य शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. शिक्षकांमुळे विद्यार्थी शिस्तबद्ध जीवन जगतात. त्यामुळे शिक्षकांची गरज सार्वकालिक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम शिक्षक करतात. प्रत्येकामध्ये वेगळा गुण असतो, तो ओळखण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असते, म्हणून शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य वळण लावतात. शिक्षकांमध्येच विद्यार्थी आई-वडील शोधतात तर आई-वडिलांमध्ये शिक्षकांच्या प्रतिमा अनुभवतात.” प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी ‘शिक्षकी व्यवसायातील नैतिकता’ या विषयावर अध्यक्षीय मनोगत सादर केले. यावेळी माझे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र बागुल हे उपस्थित होते. हर्षाली माळी व चेतना दातेराव यांनी सूत्रसंचालन तर दीपमाला भामरे यांनी आभार अभिव्यक्ती केली. प्रा. पी. डी. बोरसे व प्रा. एस. एम. ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन केले. प्रा. निशा ठाकूर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.आर.पी पाटील,प्रा.रेवती बागुल, प्रा.अमृता चव्हाण, प्रा.डॉ. योगिता चौधरी, प्रा. पी. एल. खाचणे, प्रा. बी. टी. शेजाळ, व प्रा. मंजुषा बावने यांनी प्रयत्न केले. तर शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.






