मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या
परभणी, (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात मागील महिनाभरापासून पावसाने खंड दिल्याने खरीप पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी आगामी रब्बी हंगामाची पेरणीही धोक्यात आली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्याची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आहे. त्यातच पावसाअभावी खरीप हंगाम हातातून गेल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रति हेक्टर एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, हळद पिकाचा पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, मागील हंगामातील उसाचा प्रतिटन ३०० रुपयांचा हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा, तसेच जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी कालव्याद्वारे दोन हजार क्युसेक पाणी तातडीने सोडावे, यांचा समावेश आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. या निर्णयात खासगी शाळांचाही समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकरी अडचणीत असताना शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घेतला नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी किशोर ढगे, प्रसाद गरुड, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, विठ्ठल चौखट, किशन शिंदे, कलिस भाई आणि रणजित चव्हाण यांनी केली आहे.











