कवठे-महांकाळ, दि. 9 सप्टेंबर (वार्ताहर): कवठे महांकाळ तालुक्यातील पवनचक्की सुरक्षा रक्षक आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली संघटनेचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे.
कामगारांच्या मागण्यांबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात अनेक बैठका पार पडल्या. त्यामध्ये कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार आता कामगारांना वेतन मिळत आहे. कामगारांच्या इतर मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार आहे.
आज बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी घाटमाथ्यावरील वाघोली वड येथे शेतकरी कामगार पक्ष प्रणित संघर्ष पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण शेतकरी कामगार पक्षाचे युवानेते भाई विनोद लगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना भाई विनोद लगारे म्हणाले, “कामगारांनी एकजूट राहून संघर्ष केला पाहिजे. पवनचक्की उभा करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन भांडवलदार मालामाल झाले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना कामावर घेतले, पण त्यांना जगण्याइतपत पगार देखील अनेक वर्षे मिळत नव्हता.”
कामगारांच्या हक्कासाठी अविरतपणे संघर्ष करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत सुशांत केंगार यांनी केले, तर प्रास्ताविक शकील मुलानी यांनी केले. याप्रसंगी अतुल पाटील, प्रदीप शिंदे, दत्तात्रय आठवले, शरद जाधव, जावेद मुलानी, अमोल चव्हाण, दीपक शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दीपक पवार, सिद्धनाथ शिंदे, सुजित लोंढे, महादेव जाधव, उदय पाटील, कुंडलिक कोळेकर, प्रकाश कदम, सदाशिव शिंदे, अशोक सोरटे, हणमंत पाटील, विशाल साळुंखे, संदीप पाटील, विष्णू पाटील, जनार्दन पाटील, आप्पासाहेब शिंदे व सर्व पवनचक्की कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उमराव पाटील यांनी मानले.







