प्रदीप ताजने
पातुर प्रतिनिधी
गावात वाढत्या अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या झरंडी गावातील मातृशक्तीने अखेर आक्रमक पवित्रा घेत अवैध दारूविरोधात एल्गार पुकारला आहे. महिलांनी एकजूट दाखवत गावातील अवैध दारूचे अड्डे थेट उद्ध्वस्त केले. महिलांच्या या धाडसी भूमिकेचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
पातूर तालुक्यातील झरंडी गावात गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक लहान मुले व्यसनाच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांमध्ये दररोज कौटुंबिक कलह, भांडणे आणि आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास महिला आणि त्यांच्या मुलांना सहन करावा लागत असल्याची व्यथा महिलांनी मांडली.
या रोजच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी एकत्र येत गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार केला आणि थेट अड्ड्यांवर धडक दिली.
महिलांची एकजूट चर्चेचा विषय
या मोहिमेत मंगलाबाई हांडे, बेबीबाई ठाकरे, संगिता पांडे, फुलाबाई हांडे, सुंदाबाई हांडे, पद्मिनीबाई ठाकरे, परबाबाई चव्हारे, कल्पनाबाई लताड, इंदूबाई शिंदे, लीलाबाई कांडकर, वंदना लताड, नादबाई पांडे यांच्यासह सुभाष राठोड, विक्रम जाधव, अनिल ठाकरे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
“दारूमुळे आमच्या कुटुंबांचे आणि मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. दारूमुक्त झरंडी, सुरक्षित कुटुंब आणि उज्ज्वल भविष्य हाच आमचा उद्देश आहे,” अशी आक्रमक भावना महिलांनी व्यक्त केली.
महिलांनी उचललेले हे पाऊल केवळ आंदोलन नसून गावातील कुटुंबव्यवस्था आणि पुढील पिढी वाचवण्यासाठीची सामाजिक चळवळ असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेनंतर अवैध दारूविक्रीवर प्रशासनानेही कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कॉलम – प्रतिक्रिया
“गावातील मातृशक्ती समोर आली तर प्रत्येक गावात दारूबंदी होऊ शकते, हे उंबरवाडी आणि झरंडी या दोन गावांनी सिद्ध करून दाखवले आहे.”
– निलेश तोताराम कापकर, सामाजिक कार्यकर्ते









