राजकारणाच्या धकाधकीतून वेळ काढत काही क्षण निवांत घालवण्यासाठी माझे मूळ गाव असलेल्या #सातारा जिल्ह्यातील दरे गावात गेलो होतो. गावाहून निघत असताना काही महिलांनी माझा ताफा थांबवला. माझ्याच गावात राहणाऱ्या या माय माऊलींचे माझ्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते पण मी त्यांना ओळखेन की नाही अशी शंका त्यांना क्षणभर जाणवली, मात्र मी या सर्व माय माऊलींना ओळखले असल्याचे सांगत त्यांच्याशी संवाद साधला.
क्षणाचाही विचार न करता या माय माऊलींनी माझ्या जवळ येऊन आस्थेने माझी विचारपूस केली. त्यांचा वयाचा मान राहून मी देखील पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळाले की नाही तेही आवर्जून विचारले. यावर सर्वांनी होकारार्थी माना हलवत हातात औक्षणाचे ताट घेऊन मला मायेने ओवाळले. आपल्या थरथरत्या उबदार हातांनी मला भरभरून आशीर्वाद दिले, तसेच राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार यायला हवे, असे मला आवर्जून बजावले.
माझ्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या राज्यातील लाखो माता-भगिनी, सर्व लाडक्या बहिणी हीच माझी खरी संपत्ती आहे. त्यांचे आशीर्वाद जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला काहीही होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.
Discussion about this post