*वार्ताहर प्रशांत माने आळे (ता. जुन्नर)-बाभळेश्वर-कडूस (मुंबई) या ४०० केव्ही अतिउच्च विद्युत वाहिनीच्या टॉवरचे काम बाधित शेतकऱ्यांनी बंद पाडले. बाभळेश्वर ते मुंबईकडे जाणारी वीजवाहिनीचे काम करण्यासाठी महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस फौजफाट्यासह आळे येथे काम करण्यासाठी येत असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यास विरोध दर्शवत काम बंद पाडले.गेल्या १० वर्षांपासून या कामाला बाधित शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही संबंधित अधिकारी काम करण्यासाठी येतात कसे? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आळे परिसरातील शेतकरी सातत्याने होणाऱ्या भूसंपादनास कंटाळले असून, त्यात उच्च दाब वीजवाहिन्याचे भूसंपादन न परवडणारे नसल्याने बाधित २९ शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते. बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा कोणताही वाढीव मोबदला मिळाला, तरी माघार घेणार नाही, येथे भूसंपादन होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला. आमदार अतुल बेनके, जि.प.स.आशाताई बुचके ,माजी आमदार शरद दादा सोनवणे माऊली खंडागळे सत्यशील शेरकर, प्रांत गोविंद शिंदे, तहसीलदार सुनील शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधरी यांनी गणेशोत्सव संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापारेषण अभियंता, बाधित शेतकऱ्यांची समन्वयक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
Discussion about this post