जत प्रतिनिधी:- जत शहरातील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. ही जनावरे मुख्य रस्त्यावर मोकाट फिरताना दिसत आहेत. त्यामुळे वाहन धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची व जनावरांची धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात काही प्राणी हाकनाक बळी जात आहेत, तर काही अपघातात मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरांचे मालक ठरवून या संपुर्ण समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. या कामात नगरपरिषदेची यंत्रणा हलगर्जीपणा करत असून कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
शहरातील मुख्य बाजारपेठ व विजयपूर-गुहाघर या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसत आहे. या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार आहे. यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर जनावरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द नगरपालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सर्वाधिक त्रास
मोकाट जनावरांचा सर्वाधिक त्रास बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना, विशेषतः भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे. नगरपालिकेकडे कोंडवाडे आहेत की नाही? असतील तर शहरातील, रस्त्यांवरील मोकाट जनावरे पाहता ती फक्त नावालाच आहेत की काय ? असा सवाल नागरिकांत उपस्थित होत आहे.



