
पातूर | प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील गावंडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नरेंद्र मेराम चव्हाण (वय ४९) यांनी सततची नापिकी, शेतीतील वाढता खर्च आणि कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावंडगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र चव्हाण यांच्या नावे चिचखेड (पिंपळखुटा) शिवारात सुमारे तीन एकर शेती होती. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च अवलंबून होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी, अनियमित पाऊस, नैसर्गिक संकटे आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या तोट्यात जात होती.
शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव न मिळणे, वाढते कर्ज आणि सततचे आर्थिक नुकसान यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नरेंद्र चव्हाण हे गावात मनमिळाऊ, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावंडगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
