सोमवार दि २९ डिसेंबर २०२५ सावनेर तालुका प्रतिनिधी :- नरेश गें कनोजे
नागपूर वृत :- नागपूर उपराजधानी येथील घटना लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच एका सुखी संसाराची राख रांगोळी झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकलेल्या सुरज नावाच्या तरुणाने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. हनीमूनसाठी श्रीलंकेला गेले असताना सुरू झालेला वाद, त्यानंतर पत्नीचे माहेरी परतणे आणि ४० लाख रुपयांसाठी होणारा अमानुष छळ, या घटनाक्रमाचा शेवट पतीच्या आत्महत्येने झाला आहे.
नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सुरजचा विवाह २६ वर्षीय गानवी उर्फ राशी हिच्याशी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर हे नवदाम्पत्य हनीमूनसाठी श्रीलंकेला गेले होते. मात्र, तिथेच त्यांच्या संसाराला नजर लागली.
हनीमूनमध्ये वादाची ठिणगी आणि पत्नीचे पलायन: श्रीलंकेत हनीमून दरम्यान सुरज आणि गानवी यांच्यात काही कारणावरून जोरदार खटके उडाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, गानवी हनीमून अर्ध्यावरच सोडून तिथून थेट आपल्या माहेरी म्हणजे बंगळुरू येथे निघून गेली.
आरोप-प्रत्यारोप आणि ४० लाखांची मागणी: बंगळुरूला गेल्यानंतर गानवीने पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. मात्र, दुसरीकडे सुरजच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आणि विशेषतः हनीमूनवरून परतल्यानंतर पत्नी आणि सासरच्या मंडळींनी सुरजकडे ४० लाख रुपयांची मागणी सुरू केली होती. “पैसे दिले नाहीत तर खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी देत सुरजचा मानसिक आणि आर्थिक छळ सुरू होता.
नागपुरात पतीचा शेवट: पत्नी सध्या बंगळुरूमध्ये माहेरी होती, तर सुरज नागपुरात होता. मात्र, फोनवरून आणि सोशल मीडियाद्वारे होणारा सततचा वाद, ४० लाखांची मागणी आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी यांमुळे सुरज प्रचंड मानसिक तणावात होता. अखेर या जाचाला कंटाळून त्याने नागपूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस तपास सुरू: या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरजच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी गानवी आणि तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



