बारामती तालुक्यात मरणानंतरही मरणयातना! बाबूर्डी-लोणीत अंत्यसंस्कारासाठी लोखंडी बेड मिळेना; प्रशासनाचा ‘स्मशान’ शांतता!विशेष प्रतिनिधी: रोहित जगताप (सारथी महाराष्ट्राचा)बारामती:एकीकडे बारामती तालुक्याचा विकास आणि हाय-टेक सुविधांची चर्चा राज्यभर होत असताना, दुसरीकडे तालुक्यातील बाबूर्डी आणि लोणी येथील ग्रामस्थांना मात्र आपल्या प्रियजनांच्या अंत्यविधीसाठी नरकयातना भोगाव्या लागत आहेत. येथील स्मशानभूमीतील प्रेत जाळण्यासाठीचे लोखंडी बेड चोरीला जाऊन अनेक महिने उलटले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने अद्याप याची साधी दखलही घेतलेली नाही, की नवीन साहित्य बसवण्याची तसदी घेतली नाही. परिणामी, मृतांच्या पार्थिवावर चक्क जमिनीवर सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली आहे.प्रगत बारामतीत हे काय सुरू आहे?मिळालेल्या माहितीनुसार, बाबूर्डी आणि लोणी येथील स्मशानभूमीतून प्रेत जाळण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी अँगल आणि स्टँड अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. चोरी होऊन अनेक महिने झाले, तरीही नवीन साहित्य बसवण्यात आलेले नाही. “जिवंतपणी संघर्ष केलाच, पण मेल्यावरही नशिबी सुख नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. बारामती सारख्या तालुक्यात जिथे कोट्यवधींच्या विकासकामांच्या गप्पा मारल्या जातात, तिथे साध्या स्मशानभूमीतील लोखंडी बेडची व्यवस्था होऊ नये, हे अत्यंत लाजीरवाणे आहे.प्रशासकीय उदासीनता चव्हाट्यावरया गंभीर विषयाबाबत स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींना वारंवार कल्पना देऊनही अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. सरकारी मालमत्तेची चोरी होऊनही प्रशासनाने गप्प बसणे पसंत केले आहे. पावसाळी वातावरणात किंवा ओल्या जमिनीवर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. “बॉडी खाली जमिनीवर जाळली जात आहे, मृत्यूनंतरही ही कसली अवहेलना?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.आंदोलनाचा पवित्राअनेक महिने उलटूनही साध्या स्मशानभूमीतील सुविधेसाठी प्रशासन हालचाल करत नसेल, तर याचा अर्थ काय? असा संताप व्यक्त केला जात आहे. जर येत्या काही दिवसांत स्मशानभूमीतील लोखंडी बेड आणि इतर सुविधा पूर्ववत केल्या नाहीत, तर बारामती पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयावर धडक देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.”बारामती तालुक्याचे नाव जगात घेतले जाते, पण आमच्या गावातील स्मशानभूमीत साधी सोय नाही. अनेक महिने झाले बेड चोरीला गेलेत, पण कुणालाही पाझर फुटत नाही. मृताच्या सन्मानासाठी तरी प्रशासनाने जागे व्हावे.” > — संतप्त ग्रामस्थ, बाबूर्डी-लोणी (बारामती)रिपोर्ट: रोहित जगताप, सारथी महाराष्ट्राचा