प्रतिनिधी / प्रा. संदीप पाटील
मालती पाटील कन्या महाविद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा…
‘आईची सामर्थ्यता म्हणजेच मालती महाविद्यालय होय.ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाच्या आयुष्याला आकार देते. त्याला संस्काराचे बाळकडू पाजते आणि संकटात आधार देते. अगदी तसेच कार्य हे महाविद्यालय विद्यार्थिनींच्या जीवनाला आकार देत आहे. मुलींनो तुम्ही खूप भाग्यवान आहात अशा संस्काररूपी महाविद्यालयात शिकत आहात. कारण बदलत्या काळानुसार आज प्रगती झाली असली तरी मनाचा मोठेपणा कमी झाला आहे. संतांच्या विचारांची कास धरून आनंदाने जगण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन कीर्तनकार कवी.प्रा. ऋषिकेश खारगे यांनी केले.
येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्या, प्रा.सौ.हर्षाली पाटील अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्या.शीतल पाटील,प्रा. डॉ. मेघा संजय पाटील, कवयित्री. सिंधुताई कचरे , प्रमुख उपस्थित होते.
पुढे म्हणाले की ‘महाराष्ट्राला संतांची पुरोगामी परंपरा लाभली आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना मानवी जीवनातील खरा आनंद दुरापास्त झाला आहे. त्यांनी आपल्या ‘प्रीतीचे गुज, आई ,वैषाखाच्या झळा, काळजावरचे घाव,आनंदाचे झाड या कविता वाचनातून माणसाने निखळ प्रेम करायला आईकडून शिकावे, आपली नाळ मातीशी घट्ट जोडलेली असावी, मुलगी जन्माला येते तेव्हा आई जन्माला येते, असे समजावे आई-वडिलांच्या सेवेतच ईश्वराचे दर्शन लपलेले आहे. त्यांनी आपल्या कवितातून कधी हसत हसत… कधी गंभीर बनवत हा कार्यक्रम दिमाखदार बनविला.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. हर्षाली पाटील यांनी मुलीनीआत्मनिर्भर व आर्थिक साक्षर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. संस्कृती जपा फसव्या अमिषापासून दूर राहण्याचे आवाहन केले.’उज्वला पांडुरंग सूर्यवंशी.यांना महाविद्यालयाचा मानाचा मालती माता पुरस्कार रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार कला विभागातून कु.रंभा शर्मा व वाणिज्य विभागातून कु.कल्याणी साळुंखे यांना दिला.
महाविद्यालयातील प्राध्यापकानी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. क्रीडा ,सांस्कृतिक, शिष्यवृत्तीधारक,एन.एस.एस विभागात विशेष गुणवत्ता मिळवल्या बद्दल विद्यार्थिनींचा सन्मान केला.
प्राचार्य. डॉ. अंकुश बेलवटकर यांनी स्वागत व प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील आढावा घेतला. कार्याध्यक्षा प्रो.डॉ.शीला रत्नाकर यांनी अहवाल वाचन केले. या कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थिनी पालक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण, प्रा. स्वाती चौधरी यांनी केले व आभार प्रा. निलेश डामसे यांनी मानले.






