
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्या करिता रायगड मित्र मंडळ ट्रेकिंग करत दी १९ फेब्रुवारी २०२६ ला गडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता दाखल झालेत..
सन.१९८२ च साल… बॉम्बे सेंट्रलवरून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा गाडी रायगडला रवाना होत होती.. तेव्हा स्वतःच्या गाड्या तश्या कमीच होत्या त्यामुळे स्टेट ट्रान्सपोर्टच्या गाड्यांना तुडुंब गर्दी असायची.. एक रावळ नावाचा अवलिया त्या गाडीत जागा मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अचानक कोणीतरी त्याला मागे खेचत होतं.. चिडलेल्या त्याने मागे पाहिला तर भाई केनी. तेव्हा ना ओळख ना पाळख तरीही त्याने मागे खेचलं आणि त्याच्या कडे त्याच ज्यादा गाडीचे extra रिझर्व्ह तिकीट असल्याचे सांगितले.. आणि इथून चालू झाला ४० वर्षापेक्षाही जास्त टिकलेला हा रायगड मित्र मंडळाचा मैत्रीचा प्रवास!रमेश रावळ, भाई केनी, आनंद मोकाशी, तेजू मोकाशी, नरेंद्र केनी, नितीन कदम, महेंद्र जाधव, सुहास कुलकर्णी, दिलीप बांदेकर, प्रमोद टोळे, सुनील वैद्य यांसारख्या अनेक मातब्बर हाडाच्या ट्रेकर्सचा समावेश होत गेला आणि हा ग्रुप बहरू लागला..
आजवर २०० पेक्षा अधिक दुर्गांची यशस्वी मोहीम ह्या मित्र मंडळाने केली आहे..आणि वयाच्या ह्याही टप्प्यावर ते करत आहेत. ह्यांची प्रत्येक दुर्गभ्रमंती ही केवळ शिखर गाठण्यापुरती मर्यादित नसून, ती इतिहासाचा सन्मान करणारी, निसर्गाशी नाते जोडणारी आणि संघभावनेचा आदर करणारी आहे.आज हे मित्र मंडळ एक कुटुंबच भासत.. प्रत्येकाच्या सुख दुःखात घरच्यांच्याही आधी हेच उभं असत.आज वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहूनही ह्यांना बांधून ठेवणारा धागा म्हणजे रायगड. आणि त्याच रायगडा सारखी ह्यांची मैत्री अभेद्य आणि कणखर आहे.या वयातही तरुण पिढी ला मार्गदर्शन करून नवीन चेतना निर्माण करणारे हे सर्व महानुभाव महाराजांचे पाईक आहेत.





